पुण्याच्या कच-याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरणमंत्री-नगरविकासमंत्री घेणार बैठक
मुंबई | प्रतिनिधी
पुणे शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कायमस्वरुपी प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी पर्यावरणमंत्री आणि नगरविकासमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य चेतन तुपे यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, पुण्याची लोकसंख्या 45 ते 50 लाख असून महापालिका हद्दीतून दररोज सुमारे 2100 ते 2200 मेट्रिक टन घनकचऱ्याची निर्मिती होते. यातील 1100 ते 1200 मेट्रिक टन हा सुका कचरा असून 900 मेट्रिक टन ओला कचरा आहे. यातील 1200 मेट्रिक टन सुक्या कचऱ्यावर आणि 596 मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एकूण 1475 मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचे प्रक्रिया प्रकल्प कार्यरत आहेत. सद्यस्थितीत 300 मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे एप्रिल ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत पर्यावरण दंड म्हणून 80 लक्ष रुपये आणि दरमहा 10 लक्ष रुपये जमा करण्याचे निर्देश महापालिकेला दिले असल्याचेही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.