पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणात कंगनाला अद्याप दिलासा नाही
![Actress Kangana Ranaut's troubles escalate over controversial statement regarding Sikhs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/kangna.png)
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई उच्च न्यायालयात पासपोर्ट नूतनीकरणासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र सुनावणी दरम्यान कंगनाला दिलासा मिळालेला नसून येत्या २५ जूनला या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे.
या याचिकेवर सुनावणी करताना ‘पासपोर्टची अंतिम तारीख जवळ आल्यानंतर याचिका का दाखल केली गेली?’, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आणि कंगनाला पुन्हा नवी याचिका दाखल करण्याचे निर्देश देत सुनावणी २५ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. दरम्यान, कंगना राणावतला तिच्या ‘धाकड’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हंगेरी या देशात जायचे आहे. मात्र तिचा पासपोर्ट १५ सप्टेंबरपर्यंतच वैध असल्याने तिला पासपोर्टचे तातडीने नूतनीकरण करणे गरजेचे आहे. अन्यथा कंगनाला परदेशवारी करण्यात मर्यादा येऊ शकतात. परंतु वांद्रे पोलीस स्थानकात तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याने तिच्या पासपोर्ट नूतनीकरणासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासाठीच तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.