अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा मराठी सिनेसृष्टीत अभिनयाचा ठसा
निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं
![Actress, Sharmistha Raut, Marathi film industry, acting, impression, In the field of production, the step,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/sharmista-780x470.jpg)
मुंबई : अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतनं मराठी सिनेसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर आता निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. करिअरची सुरूवात करताना अभिनेत्रीला खूप स्ट्रगल करावा लागला. लहान सहान भूमिका करत शर्मिष्ठानं अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. सुरूवातीला असंही झालं की कित्येक महिने तिच्याकडे बिल्कूल काम नव्हत. तेव्हा तिने अभिनय क्षेत्र सोडून नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता.
शर्मिष्ठा म्हणाली, “मला ब्रेक मिळत नव्हता. मी आताप्रचंड खूप ऑडिशन्स दिल्या आहेत. मला कंटाळा पण यायचा पण तरीही मी ऑडिशन देऊन यायचे. मग मी माझ्याचं मनाशी ठरवलं की २००८ सुरू आहे २००९ डिसेंबरपर्यंत जर आपल्याला संधी मिळाली नाही तर गपगुमान नोकरी करायची. मग डिसेंबर उजाडला आणि म्हटलं आता एक महिना उरलाय आता काही नाही होणार.”
शर्मिष्ठा पुढे म्हणाली, “२९ नोव्हेंबरला मला अभिजीत केळकरने फोन केला होता. आमची ओळख ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेत काम करत असताना झाली होती. आम्ही एक वर्षभर एकत्र होतो. त्याचा मला फोन आला आणि तो मला म्हणाला, “मी स्टार प्रवाह वाहिनीवर ‘मन ऊधाण वाऱ्याचे’ या मालिकेत काम करतोय. तर यांना प्रमुख भूमिकेत असणारी अभिनेत्री बदलायची आहे. तेव्हा मी म्हटल अरे यार कायम बदलीची भूमिकाच येते आणि प्रमुख भूमिका बदलायची असते तेव्हाच मी का आठवतेय.”
तेव्हा अभिजीत मला म्हणाला, “नाही, ऐकना तू कर ही मालिका. २८ की ३० च एपिसोड झालेत या मालिकेचे. तू एकदा ये ऑडिशन दे.” मी त्याला म्हटलं, “अरे याच मालिकेसाठी मी लहान लहान भूमिकेसाठी चार वेळा रिजेक्ट झालेय तू प्रमुख भूमिकेचं काय घेऊन बसलाय. मग तो मला म्हणाला तू एकदा ये आणि प्रयत्न कर”
“मी घाईत ब्रूक स्टुडिओला पोहोचले. मला आठवतं ऑडिशनच्या रांगेत माझा १६९ नंबर होता. मी ऑडिशन दिली. ऑडिशन दिल्यानंतर मी हेअरड्रेसर वगैरे होते तिथे गेले. तिथे त्या विद्या ताई मला म्हणाल्या, की दुसरा चेंज सांगितलाय आणि असं कोणाला सांगत नाही आहेत दुसरा चेंज आहे तर तुम्ही तोपण करून बघा कदाचित तुमच काम होईल आणि दुसरा मी चेंज केला. तेव्हा महेशजी मला भेटले. कारण ती महेश कोठारेंची मालिका होती. त्यांचीही ती निर्माता म्हणून पहिली मालिका होती. आणि ते मला म्हणाले, की डार्लिंग काम करेंगे. मी सांगतो चॅनलला, मी बोलतो काही काळजी करू नकोस. मी म्हटलं अरे हे काय झालंय.” शर्मिष्ठा असं म्हणाली.
“नंतर लगेच ४ डिसेंबरला मला कॉल आला की तू ये आपण करतोय. मला असं झालं होतं की अरे ज्या मालिकेत मला लहान भूमिकांसाठी ४ वेळा नाकारलं होतं त्यात मला प्रमुख भूमिका कशी काय मिळाली. या संधीसाठी मी नेहमीच अभिजीतचे आभार मानेन.” असं शर्मिष्ठाने नमूद केले.