लग्नासाठी अलिबागला जात असताना अभिनेता वरुण धवनच्या गाडीला अपघात
मुंबई – आता अवघ्या काही तासांतच बॉलिवूड अभिनेता वरुण धवन हा त्याची बालमैत्रीण नताशा दलाल हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. या विवाहसोहळ्यासाठी नताशा-वरुणने परदेशी जाण्याऐवजी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या, अथांग समुद्रकिनारा लाभलेल्या अलिबाग या ठिकाणाला पसंती दिली आहे. मात्र लग्नाला जाण्यापूर्वी वरुण धवनच्या गाडीला अपघात झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी वरुण त्याच्या लग्नासाठी जुहूहून अलिबागच्या दिशेने रवाना झाला होता. मात्र याचवेळी वाटेत त्याच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने यात त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. परंतु लग्नाला जाण्यापूर्वीच हा अपघात झाल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.
अलिबागमधील येथे वरुण आणि नताशा लग्नगाठ बांधणार आहेत. अगदी मोजक्या पाहुण्यांनाच या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच सुरक्षेची अत्यंत कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. लग्नाच्या तयारीसाठी वरुण आणि नताशाच्या घरातील मंडळी शुक्रवारीच अलिबागला दाखल झाली होती. मात्र काही कारणास्तव वरुणला त्यावेळी जाणे शक्य नव्हते. त्यामुळे तो २३ तारखेला त्याच्या कारने अलिबागच्या दिशेने रवाना झाला होता. याचवेळी वाहतूक कोंडीत सापडलेल्या वरुणच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्याच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र वरुणला कोणतीही दुखापत झालेली नाही.
दरम्यान, या लग्नसोहळ्यास कलाविश्वातील दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. यात करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, कतरिना कैफ, कियारा आडवाणी, अनिल कपूर, जान्हवी कपूर असे अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या सोहळ्यात मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.