कंगनासह बहीण रंगोलीला मुंबई पोलिसांचं समन्स
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहिण रांगोली या दोघींना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले असून १० नोव्हेंबर रोजी हजार राहण्यास सांगितले आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप या दोघींवर आहे. या प्रकरणी दोघींनाही उत्तर द्यायचे आहे. त्यासाठीच हे समन्स बजावण्यात आले आहे.
कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली यांनी केलेल्या पोस्टमुळे हिंदू आणि मुस्लिम समाजात कलाकारांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी मुंबईतील वांद्रे न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनी कंगनाचे काही ट्विट्स आणि तिच्या वक्तव्याचे व्हिडीओ न्यायालयात सादर केले आहेत. या प्रकरणी कंगना आणि रंगोलीविरोधात ऑक्टोबर महिन्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी दोघींना समन्स बजावले असून १० नोव्हेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.