Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

एकनाथ शिंदे यांचं सरकार ६ महिन्यात कोसळू शकतं, मध्यावधी निवडणुकीला तयार राहा : शरद पवार

मुंबई : नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी अधिक समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या आलेलं सरकार सहा महिन्यात कोसळू शकते, त्यामुळे मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची तसेच आमदारांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे संपन्न झाली. याप्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आमदार उपस्थित होते.

आमदारांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले, “अडीच वर्ष उत्तमपणे कारभार चालवल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आपलं सरकार पडलं. हरकत नाही. त्यांचं सरकार चार ते सहा महिन्यात पडेल. त्यांचं सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहिलं पाहिजे. आपल्या आमदारांची त्यादृष्टीने तयारी आवश्यक आहे”

“आता आपल्याला विरोधी बाकावर बसायचं आहे पण त्याचवेळी सगळ्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघात देखील जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड अधिक समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडले तर मध्यावधी निवडणुका लागतील. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला आत्तापासून सुरुवात करा”, असं पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button