breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

विधानपरिषदेच्या माध्यमातून एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून मोठी ताकद; भाजपच्या गडाला सुरुंग लावणार?

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी एकनाथ खडसे यांचे नाव जाहीर केल्यानंतर आज खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. खडसे हे राज्याच्या राजकारणात मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. मात्र गेल्या काही वर्षांत सत्ताकेंद्रापासून दूर राहिल्याने त्यांच्या राजकीय वर्चस्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होतं. भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादीत सामील झालेल्या एकनाथ खडसे यांच्यासाठी आता विधानपरिषदेच्या निमित्ताने आपलं राजकीय वजन वाढवण्यासाठी नवी संधी निर्माण झाली आहे.

विधानपरिषदेच्या माध्यमातून राष्ट्रवादीने ताकद दिल्याने आता एकनाथ खडसे यांच्यासमोर पक्षवाढीचं मोठे आव्हान असणार आहे. भाजपच्या गडाला सुरुंग लावून जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला बळ देण्याचं काम खडसे यांना करावं लागणार आहे. ‘ज्या निष्ठेने गेल्या ४० वर्षात काम केले त्याहून अधिक ताकदीने आता राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार,’ असं म्हणत एकनाथ खडसे यांनी याबाबतचे संकेतही दिले आहेत.

जळगाव जिल्ह्याचं राजकारण आणि एकनाथ खडसे

जळगाव जिल्ह्यात भाजप पक्ष वाढीमध्ये एकनाथ खडसेंचा मोठा वाटा आहे. यासाठी त्यांनी अनेक वर्ष सातत्याने काम केले. भाजपमध्ये असताना खडसेंनी अनेक खात्यांच्या मंत्रिपदाची जबाबदारीही पार पाडली आहे. तसंच विरोधी पक्षनेते म्हणून विधानभवनही गाजवले आहे. यामुळे एकनाथ खडसे हे राज्याच्या राजकारणात मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. मात्र २०१४ साली राज्यात भाजपची सत्ता असताना महसूलमंत्री म्हणून काम करणाऱ्या खडसे यांचे पुण्यातील भोसरी येथील कथित भूखंड घोटाळ्यातनाव आले आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या पत्नीसोबत संभाषणाचाही आरोप खडसेंवर झाला होता. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी राजकीय छळ केल्याचा आरोप खडसे यांनी अनेकदा केला आहे. जळगावमध्ये विविध निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करत या सगळ्याचं उट्ट काढण्याचा प्रयत्न आगामी काळात एखनाथ खडसे यांच्याकडून केला जाऊ शकतो.

विधानपरिषदेतील एण्ट्रीनंतर होणार फायदा

एकनाथ खडसे पक्षात आल्यानंतर जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चैतन्य पसरले होते. खडसेंच्या पाठोपाठ त्यांचे समर्थकही राष्ट्रवादीत दाखल झाले. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत खडसेचं नाव पाठवण्यात आलं होतं. मात्र राज्यपालांनी दोन-अडीच वर्षानंतरही यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खडसे यांचा या निवडणुकीत विजय झाल्यास पुन्हा एकदा विधिमंडळात त्यांचा आवाज घुमणार आहे.

मोठं राजकीय आव्हान

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांचा २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी हा तालुका खडसे यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र याच बालेकिल्ल्यात असलेल्या बोदवड नगरपंचायतींवर खडसेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला सत्ता मिळालेली नाही. या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या केवळ सहा जागा निवडून आल्या. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा अद्याप पाहिजे तेवढा प्रभाव दिसलेला नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचं शिवधनुष्य खडसे यांना पेलावं लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button