‘डीआरएस’चा वाद आफ्रिकेसाठी लाभदायी -एल्गर
केप टाऊन | निर्णायक तिसऱ्या कसोटी सामन्यात पंच निर्णय आढावा प्रणालीने (डीआरएस) साथ न दिल्यामुळे भारतीय खेळाडूंचे लक्ष भरकटले आणि तेथूनच आफ्रिकेने वेगाने धावा जमवण्यास प्रारंभ केला, असे मत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने व्यक्त केले. तिसऱ्या लढतीतील तिसऱ्या दिवशी एल्गर फलंदाजी करत असताना रविचंद्रन अश्विनच्या एका चेंडूवर तो चकला आणि मैदानावरील पंचांनीही त्याला पायचीत बाद ठरवले. एल्गरने ‘रिव्ह्यू’ची मदत घेतल्यावर पुर्नआढाव्यात चेंडू यष्टय़ांवरून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीसह भारताच्या खेळाडूंनी यावर नाराजी व्यक्त केली.
‘‘२४० धावांचा पाठलाग करताना आमची सुरुवात अडखळती झाली. परंतु माझ्याविरुद्ध झालेल्या ‘डीआरएस’नाटय़ामुळे भारतीय खेळाडूंचे लक्ष भरकटले. याचाच मी आणि पीटरसनने लाभ उचलून लक्ष्याच्या दिशेने वाटचाल केली. त्या प्रसंगानंतर आम्ही आठ षटकांत ४० धावा वसूल केल्या,’’ असे एल्गर म्हणाला.
नवी दिल्ली :जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या क्रमवारीत भारताची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाच्या खात्यावर सर्वाधिक ५३ गुण जमा असले तरी, ४९.०७ टक्के गुणांमुळे त्यांचा पाचवा क्रमांक लागला आहे. दुसऱ्या हंगामातील नऊ कसोटी सामन्यांपैकी भारताने चार सामने जिंकले आहेत, तर तीन सामने गमावले आहेत.