‘आम्ही पुन्हा येऊ’ कसब्यातील पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट
चिंचवडचा विजय ही स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांना भावपूर्ण आदरांजली
पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला. कसब्यात भाजपला मोठा धक्का बसला. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा मोठा पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी तब्बल ११ हजार ४० मतांनी रासने यांचा पराभव केला. कसब्यातील पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आम्ही पुन्हा येऊ’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, चिंचवड विधानसभा क्षेत्रातून भाजप उमेदवार अशिवीनी ताई जगताप विजयी झाल्या. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विकासाला साथ देणाऱ्या चिंचवडवासियांचे मनापासून आभार! स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांना ही भावपूर्ण आदरांजली आहे. कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो. पण, एक नक्की सांगतो, आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’! असं म्हटलं आहे.
दरम्यान, भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी पराभवानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाल की, २०१९ मध्ये किंवा त्यापूर्वी निवडणुका तिरंगी-पंतपंगी झाल्या. यंदा प्रथमच थेट लढत होती. त्यात उमेदवार म्हणून मी कमी पडलो. जनतेचा कौल मान्य आहे. मात्र यापुढेही लोकांच्या सेवेसाठी सक्रिय राहणार, असं म्हटलं आहे.