गाफील राहिल्याने राज्यसभेत पराभव, विधानपरिषदेला ताकही फुंकून पिण्याची गरज: एकनाथ खडसे
अंबरनाथ: राज्यसभा निवडणुकीत गाफील राहून पराभव झाला. मात्र, विधानपरिषदेला ताकही फुंकून प्यावं लागण्याची आवश्यकता असल्याचं मत राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलंय. आज अंबरनाथमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आलेले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
शेवटी पराभव हा पराभव असतो – एकनाथ खडसे
राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बरंच काही शिकलो. जो ओव्हरकॉन्फिडन्स होता, किंवा ज्याप्रमाणे दुर्लक्ष झालं ते आता दुर्लक्ष करता काम नये, ही एक शिकवण आम्हाला त्यातून मिळाली. मात्र, शेवटी पराभव हा पराभव असतो. तो शिवसेनेचा जरी झाला तरी महाविकास आघाडीचा पराभव म्हणून तो जिव्हारी लागल्यासारखा आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
तसेच, आता विधानपरिषदेला दूध पिण्याच्या आधी ताकही फुंकून प्यावं लागतं, तशाप्रकारे आता विधानपरिषदेची तयारी करत असताना प्रत्येक गोष्ट तपासून आणि विश्वासाने करण्याची आवश्यकता आहे, असं खडसे म्हणाले.
गाफील राहून मागचा पराभव झाला, अशी कबुली देत आता अधिक गाफील न राहता काळजीपूर्वक लक्ष देऊन हा विजय संपादित करायचा आहे. त्यामुळे सर्वांनी आता मागच्या पराभवाचा धडा घेऊन आता विधानपरिषदेसाठी रणनीती ठरवण्याचं ठरवलेलं आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. अंबरनाथ शहरात एका कौटुंबिक भेटीसाठी एकनाथ खडसे आले होते. यावेळी त्यांना राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीबाबत विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीये.