‘..तर एकनाथ शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते’; दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाला २० जूनला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षाकडून काल राज्यात गद्दार दिवस तर शिंदे गटाकडून स्वाभिमान दिवस साजरा करण्यात आला. दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री आणि शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या बंडाबाबत मोठे विधान केले आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने एक गोष्ट लक्षात ठेवावी. एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक आहेत. ते सच्चे मनुष्य आहेत. त्यांनी काय सांगितलं, मला ज्यावेळेला असं वाटलं असतं की मी केलेला हा उठाव यशस्वी होणार नाही. तेव्हा मी सर्व आमदारांना परत पाठवलं असतं. मी एक फोन केला असता आणि म्हणालो असतो की, माझी चूक झालेली आहे. पण यामध्ये या लोकांची चूक नाही आणि तिथेच मी माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती.
हेही वाचा – विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार
असं म्हणणारा मनुष्य कुठल्या दर्जाचा असतो, त्याच्यात कशाप्रकारची माणुसकी असते, माझ्यामुळे एकाही आमदाराचं नुकसान होता कामा नये, त्याचं राजकीय नुकसान होता कामा नये. प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल. असं म्हणणाऱ्या माणसासोबत लोकं उभं राहणार नाहीत तर कुणासोबत उभं राहणार? असं दीपक केसरकर म्हणाले.
एकनाथ शिंदे यांचा ज्यादिवशी अपमान झाला तो दिवस सुद्धा वर्धापन दिनच होता. वर्धापन दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या सगळ्यात एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला. त्याचा अत्यंत अपमान केला. त्याला खालची वागणूक दिली. ते आमचे विधीमंडळ नेते होते. त्यांचा अपमान तुम्ही का केला? याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे, असंही दीपक केसरकर म्हणाले.