Cyber Crime: कोरोना साथीला धार्मिक रंग देणारा व्हिडिओ टिकटॉकवर प्रसारित केला, पुण्यात गुन्हा दाखल
पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी
देशातील कोरोना साथीला धार्मिक रंग देणारा एक व्हिडिओ टिकटॉक या सोशल मीडियावर व्हायरल केल्याबाबत पुण्यात एक सायबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्यामुळे कोरोना काळात पुण्यात नोंद झालेल्या सायबर गुन्ह्यांची संख्या सहा झाली आहे.
पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीला धार्मिक रंग देणारा टिकटॉक व्हिडिओ बनवून तो प्रसारित केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. या व्हिडिओमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी 484 विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले आहे. यामध्ये एकूण 260 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.
राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 484 गुन्ह्यांची नोंद बुधवार (दि.17) पर्यंत झाली आहे.
आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल
* व्हॉट्सॲप- 195 गुन्हे
* फेसबुक पोस्ट्स – 199 गुन्हे दाखल
* टिकटॉक व्हिडिओ- 26 गुन्हे दाखल
* ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – 9 गुन्हे दाखल
* इन्स्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- 4 गुन्हे
* अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – 51 गुन्हे दाखल
* वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत 260 आरोपींना अटक.
* 107 आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश
महाराष्ट्र सायबरचे आवाहन
शासनाने कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या हालचालींवर काही निर्बंध आखून दिले होते. त्याकरिता नियम देखील केले होते. सध्याच्या काळात सरकारने हे घातलेले निर्बंध, नियम आणि अटी या शिथिल केल्या आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपले दैनंदिन जीवन पूर्वपदावर येण्यास मदत होत आहे.
मात्र, मागील काही दिवसांपासून विविध सोशल मीडियावर काही मेसेज व पोस्ट फिरत आहेत की, “सर्वसामान्य जनता सोशल डिस्टन्सिंग व अन्य काही नियमांचे पालन करत नाही, त्यामुळे सर्व शिथिल केलेल्या अटी, नियम व निर्बंध सरकार पुढे चालू ठेवणार आहे.”
वरील मेसेज खोटा असून अशा कोणत्याही मेसेज व पोस्टवर विश्वास ठेवू नये, तसेच अशा प्रकारचे मेसेज आपल्या सोशल साईटवर आले असता ते कुणालाही फॉरवर्ड करू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.
कोरोना महामारी संदर्भातील कोणत्याही माहितीबाबत केंद्र व राज्य सरकार हे नागरिकांना नियमितपणे अधिकृतरीत्या निवेदन करून सर्व माहिती तपशीलवारपणे देत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी फक्त त्याच माहितीवर विश्वास ठेवावा. तुम्ही जर व्हॉट्सॲप ग्रुप एडमिन किंवा ग्रुप क्रिएटर असाल व त्या ग्रुपवर कोणी असे मेसेज पाठवत असेल तर त्या ग्रुप सदस्यास तात्काळ ग्रुपमधून काही काळाकरिता काढून टाकावे. ग्रुप सेटिंग्ज बदलून ओन्ली ऍडमिन्स असे करण्याच्या सूचनाही महाराष्ट्र सायबरने दिल्या आहेत. अफवा पसरविणा-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील महराष्ट्र सायबरने दिला आहे.