#COVID19 : बांधकाम कामगारांसाठी मध्यान भोजन योजना सुरू करा : आमदार लक्ष्मण जगताप
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन शासनाने केले आहे. या परिस्थितीत गवंडी काम करणारे, बिगारी, बांधकाम व्यावसायिकांकडे छोटी-मोठी कामे करून पोट भरणारे, तर साफसफाई करून पैसे कमावणारे आणि घरापासून शेकडो किलोमीटर लांब असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम कामगारांवर ‘कोरोना’ने उपासमारीची वेळ आणली आहे. त्यामुळे राज्यातील बांधकाम कामगारांची मध्यान्ह भोजन योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने अटल सन्मान योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजनाची व्यवस्था सुरू करण्यात आली होती. मात्र ही योजनाच बंद करून टाकल्या मुळे महाराष्ट्रासह पिंपरी-चिंचवडमधील हजारो बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.कोरोनाच्या संकटकाळात ही योजना बांधकाम कामगारांसाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे
यासंदर्भात मागणीचे पत्र जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना ई – मेल केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाऊन असल्याने शहरातील सर्व कामे बंद आहेत. बांधकाम कामगार रस्त्यावर आले आहेत. पिंपरी चिंचवडमधील रहाटणी, सांगवी, डांगे चौक नाक्यावर बांधकाम कामगारांसाठी अटल सन्मान योजनेअंतर्गत सुरू असलेली मध्यान्ह भोजन योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे खायचे काय असा प्रश्न बांधकाम कामगारांना पडला आहे.
देश आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून कामांसाठी आलेले कामगार या परिस्थितीमुळे शहरातच अडकून पडले आहेत. शहरात काम करताना ही मंडळी ज्या साइटवर काम चालायचे, तिथेच राहायचे. पण आता कामेच बंद असल्याने जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. या सगळ्यात प्रमुख समस्या आहे, ती त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची. या सर्व कामगारांचे हातावरचे पोट आहे. सध्या आणीबाणीची परिस्थिती असताना बांधकाम कामगारांचे जेवण बंद करणे योग्य नाही. कामगार कल्याण विभागाचा सुरू असलेला भोंगळ कारभारामुळे मध्यान्ह भोजन योजना बंद झाली आहे. याची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. कामगारांची सामाजिक सुरक्षा, संरक्षण, जेवण या सुविधा देण्याकरिता कटिबध्द असलेल्या शासनाप्रती कामगारांच्या मनामध्ये नाराजी निर्माण झाली आहे.