देशात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ; ४० हजार नवे रुग्ण, ५६२ मृत्यू
नवी दिल्ली – कोरोनाची दुसरी लाट अजून संपली नसल्याचे काल आरोग्य मंत्रालयाने सांगितले. देशात काही राज्यांत कोरोना वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये परिस्थिती अद्याप नाजूक असल्याचे दिसते. तर काही ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. देशात गेल्या २४ तासांत ४२,६२५ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर ३६,६६८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यासह आतापर्यंत देशभरात एकूण ३,०९,३३,०२२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तसेच गेल्या २४ तासांत ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या देशात रिकव्हरी रेट ९७.३७ टक्के आहे. देशात सध्या कोरोनाची ४,१०,३५३ सक्रिय रुग्ण आहेत. देशभरात लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीचे ४८.५२ कोटी डोस लोकांना देण्यात आले आहेत. गेल्या २४ तासांत लसीचे ६२,५३,७४१ डोस देण्यात आले आहेत. देशातील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. दुसऱ्या लाटेनंतर या प्रकरणातील तेजीमुळे केंद्र आणि राज्य सरकारची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयानेदेखील सांगितले की, देशभरात असे १८ जिल्हे आहेत, जिथे कोरोनाची नवीन प्रकरणे वाढत आहेत. यापैकी १० जिल्हे केवळ केरळमधील आहेत, तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.