#COVID19 : परप्रांतीय कामगारांना वाऱ्यावर सोडू नका : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले
सातारा । महाईन्यूज । प्रतिनिधी
कंपनी
मालकांनी कामगारांचे पालक बनून आधार देण्याचे केले आवाहन
सातारा- जगभरात कोरोना या विषाणूच्या
महामारीने थैमान घातले आहे. आपल्या देशात आणि महाराष्ट्रातही कोरोना या साथीच्या
आजारामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉक डाऊन घोषित केला आहे. अशा परिस्थितीत परप्रांतीय
कामगार कामाच्या ठिकाणी अडकून पडले आहेत. अशा परप्रांतीय कामगारांच्या निवास, भोजन आणि औषोधोपचाराची
जबाबदारी त्या- त्या कंपनी अथवा कारखाना चालकांनी, व्यवस्थापनाने
घ्यावी. कोरोना सारख्या महाभयंकर साथीच्या प्रसंगी सर्वांनी माणुसकी दाखावावी.
मालकांनी कामगारांचे पालकत्व स्वीकारावे. त्यांना वाऱ्यावर सोडू नये, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
कोरोना सारख्या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी सर्वांनी घरात
राहणे आवश्यक आहे. प्रशासनाला सहकार्य करून सर्वांनी गर्दी करणे टाळावे, यासाठीच लॉक डाऊन सारख्या प्रभावी निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरु
आहे. सर्वत्र लॉक डाऊन सुरु असला तरी अत्यावश्यक सेवा पुराणाऱ्या विविध संस्था,
कंपन्या यासह सहकारी तसेच खाजगी साखर कारखाने सुरु आहेत. अशा
कंपन्या, कारखान्यांमध्ये अनेक परप्रांतीय कामगार कामाला
आहेत. लॉक डाऊनमुळे अशा कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अजिंक्यतारा सहकारी
साखर कारखाना, अजिंक्यतारा सूत गिरणीमध्ये कंत्राटी बेसिसवर
असलेल्या परप्रांतीय कामगारांचे पालकत्व या दोन्ही संस्थांच्या व्यवस्थापनाने
घेतले असून या सर्व कामगारांच्या निवास, भोजनाची व्यवस्था
करण्यात आली आहे.
लॉक डाऊनमुळे परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी जाता आले
नाही, त्यामुळे हे कामगार अडकून पडले आहेत. त्यांच्यावर
उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी त्या- त्या कंपनी चालक,
मालकांनी आणि कारखाना व्यवस्थापनाने त्यांचे पालक बनून त्यांच्या
निवासाची, भोजनाची आणि औषोधोपचाराची जबाबदारी उचलणे आवश्यक
आहे.
एक सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी म्हणून संबंधित सर्व कंपनी
आणि कारखाना व्यवस्थापनाने अशा परप्रांतीय कामगारांना कोरोनासारख्या संकटसमयी
आपुलकीचा हात देऊन त्यांचे पालन पोषण करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे
यांनी केले आहे.