#Coronolockdown:परप्रांतिय गेलेत, मराठी तरुणांना संधी आलीय : राज ठाकरे
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाला अनेक प्रकारच्या सूचना केल्या. राज्यातील परप्रांतीय बाहेर गेल्यामुळे महाराष्ट्रात रोजगार निर्माण झाला आहे. या संधी राज्यातील तरुणांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळेल, अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
“ज्या पद्धतीने ते महाराष्ट्रातून गेले आहेत. ते जेव्हा परत येतील किंवा आणले जातील. त्यावेळी त्यांची तपासणी केल्याशिवाय आत घेऊ नये. तसेच त्याचवेळी त्यांची राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करुन घ्यावी. हीच ते वेळ आहे, नंतर ते करता येणार आहे. त्यामुळे आतापर्यंत जो गुंता झाला तो सोडवता येऊ शकतो,” अशीही सूचना राज ठाकरेंनी दिली.
“प्रत्येक ठिकाणी माणुसकी माणुसकी असं नसतं. तुम्ही इतर ठिकाणी गेल्यावर ते तुमच्याकडे माणुसकी म्हणून बघत नाहीत. ते यंत्रणांप्रमाणे काम करतात,” असेही राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.