#CoronaVirus: लोकांचे जीव वाचवण्यासाठी हाच एक उत्तम मार्ग; ICMRचा राज्यांना महत्त्वाचा सल्ला
कोरोनामुळे देशातील काही राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक बनलेली आहे. अनेक राज्यांमध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली ह असून, करोनाचा संसर्ग रोखण्याबरोबरच लोकांचे जीव वाचवण्यासाठी संबंधित राज्यांना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरनं महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे.
मंगळवारी देशातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येत १४ हजार रुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात १४ हजार ९३३ जणांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं. तर दिवसभरात ३१२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १ लाख ७८ हजार १४ रुग्ण उपचार घेत असून, २ लाख ४८ हजार १९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. करोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीत काही राज्यातील रुग्णांची संख्या मोठी आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं चिंताजनक परिस्थिती असलेल्या राज्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. राज्य सरकारांनी, सार्वजनिक व खाजगी संस्था, रुग्णालये यांनी चाचण्यांचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक पावलं उचलावित. टेस्ट करणं, ट्रॅक करणं व ट्रीट करणं हाच एकमेव मार्ग आहे, ज्यामुळे करोनाचा प्रसार थांबवून लोकांचे जीव वाचवता येईलं, असं आयसीएमआरनं म्हटलं आहे.