#CoronaVirus: रोहित पवार म्हणतात …तर आर्थिक संकटाशी लढतानाच आपण मोडून पडू की काय याचीच अधिक भीती वाटते
लॉकडाउन शिथील होत असल्याने आता योग्य ती काळजी घेऊन लोकांनी घराबाहेर पडलं पाहिजे असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि युवा आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी आर्थिक संकटाचा डोंगर दररोज नवनवी उंची गाठत असून आपण असंच घरात बसून राहिलो तर संकटाची उंची एवढी वाढेल की मग त्यावर मात करणंही आपल्याला कठीण होऊन बसेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तरुणांना मिळालेल्या संधीचा फायदा घेण्याचं आवाहन करत आपलं मत मांडलेलं आहे.
https://m.facebook.com/RRPspeaks/posts/942378429559233?refsrc=http%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra-news%2Fcoronavirus-lockdown-ncp-rohit-pawar-facebook-post-appealing-people-to-come-out-and-work-sgy-87-2184572%2F
काय लिहिलं आहे फेसबुक पोस्टमध्ये –
“करोनाला हरवण्यासाठी लॉकडाउन केल्याने गेली काही महिने आपण घरात आहोत. पण आता परिस्थिती बदलतेय व लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणलीय. तरीही लोकांमध्ये अजून भीतीचं वातावरण आहे. पण योग्य काळजी घेऊन आपल्याला आता घराबाहेर पडावं लागेल. कारण गेल्या दोन-तीन महिन्यात आर्थिक संकटाचा डोंगर दररोज नवनवी उंची गाठतोय. आपण असंच घरात बसून राहिलो तर या संकटाची उंची एवढी वाढेल की मग त्यावर मात करणंही आपल्याला कठीण होऊन बसेल,” अशी भीती रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
“मुलांनी आता पालकांवर जबाबदारी न टाकता त्यांची काळजी घेऊन आणि स्वतः पुढं येऊन जबाबदारी घ्यायला पाहिजे. कारण वयोमानानुसार शुगर, किडनी, हार्ट, मधुमेह, दमा, रक्तदाब अशा प्रकारचे आजार पालकांना असू शकतात. त्यामुळे अशा पालकांनी तसंच गर्भवती महिला व ५५ वर्षांपुढील नागरिक यांनी स्वतःची काळजी घेऊन मुलांना नोकरीसाठी पाठवणं फायद्याचं होऊ शकतं. पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या ठिकाणी नोकरीला गेल्यानंतर करोना प्रतिबंधक नियम काटेकोर पाळून पुन्हा घरी जाणं टाळायला पाहिजे,” असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे.
“आज खासगी क्षेत्रांत रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. हे आणखी किती काळ चालेल माहित नाही. म्हणून कोणत्याही कामाला लहान-मोठं न समजता मिळेल तिथे कामाला सुरुवात करायला पाहिजे. पण आपण असेच घरात बसून राहिलो तर अडचणी वाढू शकतात. कंपन्यांमध्ये तरुणांना बोलावलं तर ते लगेच कामावर जॉईन होण्यास तयार नसतात. काहीजण सवडीने किंवा दोन महिन्यांनी किंवा करोना संपल्यावर जॉईन होऊ असं सांगतात. पण मला वाटतं कामाच्या बाबतीत जर आपण अशी कारणं देत बसलो तर ते आपल्याच नुकसानीचं होईल,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.