#CoronaVirus | राज्यातील 89 हजार कोरोना चाचण्यांपैकी 94% निगेटिव्ह
औरंगाबाद | राज्यात २१ एप्रिलपर्यंत झालेल्या एकूण कोरोना चाचण्यांपैकी ९४.१५ टक्के चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वैद्यकीय शिक्षण व आैषधी विभागाच्या ताज्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. मुंबई-पुण्यासह राज्यात रुग्णांची संख्या वाढत असताना या अहवालातील हे निष्कर्ष काहीसे दिलासादायक ठरले आहेत. ९ मार्च रोजी राज्यात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता.
त्यानंतर रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र याचदरम्यान चाचण्यांचे प्रमाणही वाढले असून आता राज्यात दररोज ७ हजारपेक्षाही अधिक चाचण्या घेण्यात येत अाहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने गुरुवारी जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार आतापर्यंत झालेल्या ८९ हजार १९७ चाचण्यांपैकी ८३ हजार ९७९ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. हे प्रमाण ९४.१५ अाहे. यामध्ये शासकीय आणि खासगी लॅबमधील चाचण्यांचा समावेश आहे. उर्वरित ५,२१८ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.