#CoronaVirus: जगभरात 73,968 कोरोना संक्रमित रुग्णांची रोगातून सुखरूप सुटका
वॉशिंग्टन | महाईन्यूज
जगभरात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. अनेक देशात कोरोनाच्या धास्तीनं शाळा, कॉलेजसह मॉल्स बंद ठेवण्यात आले आहेत. चीनच्या वुहानमध्ये केंद्रबिंदू असलेल्या या कोरोनानं जगभरात पाय पसरले आहेत. जगभरात 156,396 कोरोना व्हायरसनं संक्रमित झालेले रुग्ण आढळून आले असून, त्यात चीनमध्ये जवळपास 80955 कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. त्याच्या खालोखाल इटलीमध्ये 21,157 रुग्ण संक्रमित असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत जगात कोरोना संक्रमित 5833 लोकांचा मृत्यू झाला असून, त्यात 3085 मृत्यूचा आकडा एकट्या चीनमधला आहे.
तसेच त्यापाठोपाठ इटलीत 1441 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमित असलेल्या रुग्णांचा ठणठणीत होण्याचा आकडाही चांगला आहे. जगभरात 73,968 कोरोना संक्रमित रुग्ण या रोगातून सुखरूप बरे झाले आहेत. त्यातील चीनमधलेच 54,278 रुग्ण ठणठणीत झालेले आहेत, तसेच इराणमधल्या 2,959 या आजारातून सुटका झालेली आहे. इटलीमध्ये 1,966 रुग्ण ठीकठाक झाले असून, स्पेनमध्ये 517 रुग्ण आजारातून बाहेर पडलेले आहेत. दक्षिण कोरियामध्येही 510 रुग्ण या आजारातून बाहेर पडलेले आहेत. . दक्षिण कोरियामध्येही 510 रुग्ण या आजारातून बाहेर पडलेले आहेत. भारतातही 100हून अधिक कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्यानं केंद्र सरकारनंही सतर्कता बाळगली आहे. महाराष्ट्रात काल रात्री कोरोनाचा संसर्ग झालेले पाच रुग्ण आढळून आल्यानं देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 96वरून वाढून 101वर पोहोचली आहे.
भारतात आतापर्यंत या विषाणूमुळे 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती कारवाई करत असून, कुणीही घाबरून जाऊ नये, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. देशातील सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, सतर्कता बाळगावी असे आवाहन केंद्र सरकारने नागरिकांना केले आहे. केंद्र सरकारनं कोरोना(कोविड-19)ला राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सार्क देशांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे या संकटावर चर्चा करणार आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शेजारील पाच देशांच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत. भारत-नेपाळ, भारत-बांगलादेश, भारत-भूतान, भारत-म्यानमार, भारत-पाकिस्तान या देशांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. आता या सीमांवरून देशात प्रवेश करण्यास प्रवाशांना प्रतिबंध घालण्यात आले आहेत.