breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: घराच्या अंगणाला ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत; अजित पवार यांचं भाजपावर टीकास्त्र

“स्वत:च्या घराच्या अंगणालाच ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाही. आज, महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलीस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन करोनाविरुद्ध शर्थीनं लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणं हा समस्त करोना योद्ध्यांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्र करोनाविरुद्धची एकजुटीनं लढाई लढत असताना, अशा आंदोलनातून या लढाईत अडथळे निर्माण करण्याचा, महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न राज्यातील जनताच हाणून पाडेल,” असा इशारा अजित पवार यांनी भाजपाला दिला.

राज्यात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचा आरोप करत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी काळे झेंडे आंदोलन केलं होतं. या आंदोलनाविषयी अजित पवार यांनी भूमिका मांडली. “अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राचं आणि भाजपाचं काहीही भलं होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण करोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत असताना अशा पद्धतीचं ‘काळं’ आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात कशी येऊ शकते. हा राज्याला पडलेला प्रश्न आहे,” अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

करोनाविरुद्धची लढाई संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीने लढत असून सर्व आव्हानांवर मात करुन ही लढाई आपण नक्की जिंकू. मुंबईसह महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या वाढत असली, तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना केल्या गेल्या आहेत. आरोग्य सेवा सक्षम करण्यात आली आहे. मुंबईतील झोपडपट्टया, दाट लोकवस्ती तसेच इतर सर्व आव्हानांवर मात करुन आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. गेल्या महिन्यात काही संस्थांनी संभाव्य आकडेवारीनुसार ‘१५ मेपर्यंत मुंबईत साडेसहा लाख कोरोना रुग्ण असतील,’ असा अंदाज वर्तवला होता. आज आपल्या राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ४० हजारांच्या आत आहे. त्यांच्यापैकी १० हजार रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी परतले आहेत. राज्याने गेला सव्वा महिना सहा लाखांहून अधिक परप्रांतीय मजूरांच्या निवास, भोजन आणि वैद्यकीय उपचारांची सोय केली. आजमितीला ५ लाख परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात सुखरुप परतले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक यंत्रणा, प्रत्येकजण आपापल्या परीने या लढाईत सहभागी झाला आहे,” असं अजित पवार म्हणाले.

“महाराष्ट्र आव्हानांचा यशस्वी सामना करत असताना भाजपाने ‘काळे झेंडे’सारखे आंदोलन करुन महाराष्ट्रातील करोना योद्ध्यांचा अपमान करुन नये. करोनाविरुद्धच्या लढाईत अडथळे आणू नये. भाजपाने काळे झेंडे आंदोलन मागे घेऊन करोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हावे, महाराष्ट्रविरुध्दच्या कटाचा भाग बनण्याचं पाप माथी घेऊ नये,” असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाला दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button