#CoronaVirus : अखेर शहरांपासून खेड्यापाड्यात धावणारी ‘लालपरी’ थांबली
मुंबई : राज्यातील मोठ्या शहरांना गावांना आणि गावांना खेड्यापाड्यात जोडणारी लालपरी म्हणजेच एसटी बस आजपासून थांबणार आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहून राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यात लोकल वाहतूक, रेल्वे वाहतूक, मेट्रो, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या, खासगी बससह सरकारी बस सेवाही बंद करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढण्याची धोका वाढला आहे. परिणामी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यात शहरातील वाहतूक व्यवस्थेसोबत ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली एसटी बसही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रात लॉक डाऊन असणार आहे. गरज पडल्यास यावर निर्णय घेण्यात असल्याचीही माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तर, लोकल बस वाहतूक ही केवळ अत्यावश्यक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना वर्क फ्रॉम होमचं आवाहनही केलं आहे. तसेच बंदच्या काळात घरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी कंपन्यांना केलं आहे.