#CoronaVirus:कोरोनाचा वेग कमी करण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी : सर्व्हे
मुंबई : दिवसेंदिवस मुंबईसह राज्यात वाढत जाणारा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यात महाराष्ट्र सरकारला यश आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक नीरज हातेकर आणि त्यांची सहायक प्राध्यापिका पल्लवी बेल्हेकर यांनी एक अहवाल तयार केला आहे. या अहवालातून ही बाब समोर आली आहे. या अहवालासाठी दोन्ही संशोधकांनी राज्यातील आणि विविध जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा प्रशासनाकडून जाहीर होणारा आकडा ग्राह्य धरला आहे.
या अहवालातून शहरात साथीचे आजार वाढण्याची कारणे देखील नमूद करण्यात आली आहेत. यामध्ये मुंबईसारख्या शहरातील दाटवस्ती, तिथे नसलेल्या पायाभूत सुविधा या बाबी देखील कारणीभूत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. अहवालात मुंबईसारख्या शहरात योग्य व सुनियोजित गृहनिर्माण धोरणाची आवश्यकता असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. याबाबत बोलताना प्राध्यापक नीरज हातेकर म्हणाले की, कोरोना बाधितांचा वेग मंदावला असला तरी वाढलेली चाचणीची संख्या, मोठी असलेली लोकसंख्या यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचं दिसत आहे. शहरातील 42% लोकसंख्या ही शहराच्या 9.5% भागात झोपडपट्टीत राहत आहेत. अशा गर्दीच्या ठिकाणी फिझिकल डिस्टनसिंगचे नियम पाळणे अवघड असल्याने रुग्णसंख्येचा वेग अधिक असून विषाणूचा प्रसार झपाट्यांने होतं असल्याची माहिती प्राध्यापक हातेकर यांनी दिली आहे.