कोरोनाची तिसरी लाट : १००-१२५ दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचे
नवी दिल्ली – स्पेन, हॉलंडसह युरोपीय देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली असतानाच भारतासाठी आगामी १०० ते १२५ दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत, असा इशारा नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिला आहे. देशातील लोकसंख्येचा मोठा भाग कोरोनाच्या संक्रमणाला बळी पडला, असे सांगून ते म्हणाले की, जगातील आणि भारतातील रोजची कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेता आगामी १००-१२५ दिवस भारतासाठी महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती सुधारत असतानाच पुन्हा रुग्णवाढ होत असल्याने ती धोकादायक बनत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. कोरोना नियमांचे योग्य पालन केले आणि लोकांनी आपली जबाबदारी पार पाडली तर भारत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचेल. मात्र त्यासाठी आगामी १०० ते १२५ दिवस म्हणजे ३-४ महिने आपल्याला खूपच सावध राहावे लागेल. सरकारने डिसेंबर अखेर ९४ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर कोरोनाचा धोका टाळण्यात मोठे यश येईल. यामुळे आगामी ४-५ महिने भारतासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या काळात लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. देशात आतापर्यंत ४१ कोटी लोकांना लस दिली आहे. ७.५ कोटी लोकांना लसीचे दोन डोस दिले आहेत. लसींचा पुरवठा वाढवण्याच्या दृष्टीने मॉडर्ना लसीसाठी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तोपर्यंत लोकांनी मास्क, सामाजिक अंतर आणि कोरोनाच्या इतर नियमांचे पालन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.