देशावर कोरोना संकट; पश्चिम बंगालमध्ये आज सातव्या टप्प्यासाठी मतदान
कोलकाता – देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य जनता अक्षरश: जीव मुठीत धरून जगत आहे. अशा परिस्थितीत आज पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या मतदानावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे म्हटले जात आहे. तसेच मतदानात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने केंद्रीय दलाच्या ७९६ तुकड्या राज्यात तैनात केल्या आहेत.
सातव्या टप्प्यात अनेक महत्त्वाच्या जागांवर मतदान होणार असून यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे निवासस्थान असलेला आणि मतदारसंघ राहिलेल्या भवानीपूरचा समावेश आहे. मात्र ममता बॅनर्जी या यावेळी नंदीग्राममधून निवडणूक लढत असून पक्षाचे नेते सोभानदेब चट्टोपाध्याय यांच्यावर त्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून विजयाची हॅटट्ट्रीक करण्याची संधी आहे. तसेच या टप्प्यात ३६ जागांसाठी मतदान होणार असून ८१ लाख मतदार मतदानासाठी पात्र आहेत.
महत्त्वाचे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तृणमूलकडून ममता बॅनर्जी, तर भाजपाकडून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक प्रचारात सहभाग घेतल्याने या निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. गुरुवारी या निवडणुकीचा आठवा आणि शेवटचा टप्पा पार पडणार आहे. तर २ मे रोजी पश्चिम बंगालसोबत आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील निवडणूक निकाल जाहीर होतील. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करत लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले असून यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची विनंती केली आहे.
The seventh phase of the West Bengal elections takes place today. Urging people to exercise their franchise and follow all COVID-19 related protocols.
— Narendra Modi (@narendramodi) April 26, 2021