लेखी कराराकडे चीनने दुर्लक्ष केल्यानेच सीमेवर पेच- जयशंकर
नवी दिल्ली |
सीमेवर सैन्य गोळा न करण्याबाबत झालेल्या लेखी करारांकडे चीनने दुर्लक्ष केल्यामुळेच प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थिती उद्भवली असल्याचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी सांगितले. चीनच्या या कारवाया संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासाठी ‘सयुक्तिक चिंतेचा’ विषय बनला असल्याचेही ते म्हणाले. अमेरिकेचे अँटनी ब्लिंकन, जपानचे योशिमासा हायाशी व ऑस्ट्रेलियाचे मारिसे पेन या ‘क्वाड’ देशांच्या समपदस्थ परराष्ट्र मंत्र्यांसोबत जयशंकर यांनी शुक्रवारी चर्चा केली आणि हिंदू- पॅसिफिक क्षेत्र ‘बळजबरी’ पासून मुक्त ठेवण्यासाठी सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना पूर्व लडाख सीमेवरील तिढय़ाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर बोलत होते.
‘क्वाड’ परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत भारत- चीन संबंधांबाबत चर्चा करण्यात आली, कारण आमच्या शेजारी काय घडामोडी सुरू आहेत याबाबत आम्ही एकमेकांना माहिती देण्याचा तो भाग होता, असे जयशंकर संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले. सीमेवर सैन्याची जमवाजमव करू नये या भारतासोबत २०२० साली केलेल्या लेखी कराराकडे चीनने दुर्लक्ष केल्यामुळेच प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थिती उद्भवली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. एखादा मोठा देश अशा प्रकारे लेखी वचनबद्धतेकडे दुर्लक्ष करतो तेव्हा तो संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासाठी सयुक्तिक काळजीचा मुद्दा असतो असे आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.