‘बाबरी पाडताना तिथे शिवसैनिक होते पण..’; चंद्रकांत पाटलांचा सूर बदलला
बाबरी पाडली तेव्हा विश्व हिंदू परिषदेचे नेतृत्व होते
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन करुन पत्रकार परिषद घेण्यास सांगितले. माझ्या वक्तव्याचा नेहमीप्रमाणे ‘ध’चा ‘मा’ करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. बाबरी पाडली तेव्हा पक्षाचे नव्हे तर विश्व हिंदू परिषदेचे नेतृत्व होते, असे मी म्हणालो होतो असा खुलासा भाजप उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रीचंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
बाबरी पाडण्यात शिवसेना तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहभाग नव्हता, असा दावा चंद्रकांत पाटलांनी केल्याने उद्धव ठाकरेंनी त्याच्यावर पत्रकार परिषद घेऊन टीका केली. मंत्रिमंडळातून त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली. यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, बाबरी आंदोलनात आम्ही सर्व जण हिंदू म्हणून सहभागी झालो होतो. बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनात आदर आहे. मी त्यांचा अनादर केला, ही बाब मी सहन करणार. बाबरी पाडताना तिथे शिवसैनिक होते पण विश्व हिंदू परिषदच्या नेतृत्वात सहभागी झाले होते. बाबरी पाडताना संजय राऊत कुठे होते? हा माझा मुख्य सवाल होता.
विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात हा संघर्ष झाला. त्यावेळी सर्व जण हिंदू म्हणून तिथे होते, कुणीही तिथे पक्ष म्हणून सहभागी झाले नव्हते. बाबरी पाडली तेव्हा शिवसेना होती यावर माझा आक्षेप आहे. जयंत पाटील काय म्हणाले यांची काळजी करण्याची मला गरज नाही. मला उद्धव ठाकरे काय म्हणाले याची काळजी असायला हवी. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी माझ्या मनात श्रद्धा आहे. उद्धव ठाकरेंच्या टिपण्णीवर मी काही बोलणारच नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.