पोटनिवडणूक निकाल : कसब्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोठे अपयश, भाजपाचा ऐतिहासिक पराभव!
पुणे : भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत रासणे यांचा पराभव निश्चित झालाआहे. या निवडणुकीत भाजपाचे ‘डिसिझन मेकर’ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, कसब्यातील अपयशामुळे पाटील यांना नामुष्कीचा सामना करावा लागणार आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीनंतर आता कसबा मतदार संघातील पराभवाचे खापर चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर आले आहे.
१८व्या फेरीअखेर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना ९ हजार २०० मतांची आघाडी मिळाली असून आता त्यांच्या विजयाची फक्त औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे.
गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात होईल. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची करण्यात आली होती. दोन्ही बाजूचे दिग्गज नेते, मंत्री, आमदार, खासदार या मतदारसंघांमध्ये ठाण मांडून बसले होते.
या निवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळावी, अशी मागणी होत होती. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले निकटवर्ती हेमंत रासणे यांच्याकरीता पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला होता. रासणे यांना यापूर्वी भाजपाच्या सत्ताकाळात महापालिकेतील महत्त्वाचे स्थायी समिती सभापतीपद सलग तीन वर्षे देण्यात आले होते. त्यानंतर आता विधानसभेच्या तिकीटासाठीही पाटील यांनी त्यांच्या नावाला समर्थन दिले. त्यामुळे भाजपातील एक गट नाराज होता.
स्वत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील गेल्या महिन्यभारापासून पुण्यात ठाण मांडून बसले होते. तसेच, राज्यातील आणि केंद्रातील अनेक मंत्री, नेते कसब्यात आणून प्रचारांचा मोठा स्टंट चंद्रकांत पाटलांच्या पुढाकाराने भाजपाने केला. विशेष म्हणजे, भाजपाने टिळक कुटुंबाला डावलून ब्राह्मण समाजावर अन्याय केला, असा संदेश तळागाळात पोहोचला. चंद्रकांत पाटलांच्या हट्टामुळे रासणे यांन उमेदवारी मिळाली. पण, विजय खेचून आणता आला नाही. याबाबत केंद्रीय समितीकडे पाटील यांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. बालेकिल्ल्यातच झालेला हा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागणार आहे.
रासणे यांनी मान्य केला पराभव…
भाजपाचे उमेदवार हेमंत रासणे म्हणाले की, २००९ पासून हा मतदारसंघ संमिश्र झाला. त्यानंतर भाजपाने तो तीनदा जिंकला असला, तरी त्या प्रत्येक वेळी किमान तिरंगी लढत होती. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर पहिल्यांदा इथे थेट लढत झाली. त्यामध्ये आमचं हक्काचं मतदान कमी झालं आणि विरोधी पक्षाचं हक्काचं मतदान जास्त प्रमाणात झालं असं वाटतं. कार्यकर्त्यांशी, त्या भागातल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करता येईल. मी घरोघरी जाऊ शकत नव्हतो, पण आमची यंत्रमा घरोघरी गेली होती. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे घडलेलं नाही. नाराजीचा फार फरक पडला असं मला वाटत नाही. मी कुठेतरी कमी पडलो असं मला वाटतं. मला यावर थोडं चिंतन करावं लागेल. माझ्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक आहे.