राज्यातील 300 पेक्षा अधिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आज कामबंद आंदोलन

केंद्र सरकारने सूट देऊनही महाराष्ट्र सरकारने एपीएमसीमधील व्यापाऱ्यांवर लावलेल्या सेसविरोधात व्यापारी आक्रमक झाले आहेत . राज्यातील 300 पेक्षा अधिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आज कामबंद आंदोलन केलं. यात मुंबईतील सर्व एपीएमसी मार्केट, नवी मुंबई, पुणे, बारामती, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, मनमाड, सातारा, नीरा, फलटण, लातूर, बार्शी, अमळनेर, शिरपूर, नंदुरबार, नांदेड, अहमदनगर या सर्व मार्केटने 100 टक्के बाजार बंद ठेवत सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
पुण्यातील व्यापारी असोसिएशन, महाराष्ट्र व्यापार फेडरेशन, चेंबर ऑफ असोसिएशन या सर्व व्यापारी संघटनांनी राज्य सरकारला सेस हटवण्याची मागणी केली आहे. वारंवार मागणी करुनही सरकारने दुर्लक्ष केल्याने अखेर व्यापाऱ्यांनी राज्यस्तरीय बंद पुकारला. याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील सर्व एपीएमसी मार्केट आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले.

केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार व्यापाऱ्यांना एपीएमसी वस्तूंच्या व्यवहारातील बाजारपेठ शुल्कातून सूट देण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने अद्याप अजूनही व्यापाऱ्यांवर 1 टक्के सेस आकारणे सुरुच ठेवले आहे. याचविरोधात व्यापाऱ्यांनी बंदचा मार्ग निवडला होता.
राज्य शासनाकडे कायम पाठ पुरावा करुनही एपीएमसीमधील कृषी उत्पन्नावर लावण्यात आलेल्या एक टक्का बाजार शुल्क रद्द करण्यात आलेला नाही. तो सरकारने तात्काळ रद्द करावा. केंद्र शासनाने एपीएमसी संदर्भात नवीन कायदा आणला आहे. त्यात एपीएमसीच्या बाहेर होणाऱ्या खरेदीवरील सेस हटवला आहे. त्यामुळे एपीएमसीमधील व्यापाऱ्यांना लावण्यात येणारा सेसही रद्द करावा, अशी मागणी व्यापारी करत आहे.

केंद्र सरकारच्या नव्या धोरणापासून एपीएमसीमधील सेस हटवण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारने ही मागणी मान्य केलेली नाही. त्याविरोधातच व्यापाऱ्यांनी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी बंद पुकारला.





