Budget 2022 : राहुल गांधी यांची दया येते, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची टीका
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
राहुल गांधी यांची दया येते असं म्हणत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात भविष्यातल्या 25 वर्षांच्या आर्थिक विकासाच्या अपेक्षा मांडल्या आहेत. 25 वर्षांचा अमृतकाळ असं त्यांनी याचं वर्णन केलं. 39.45 लाख कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ज्यावर राहुल गांधी यांनी टीका केली आहे. हे बजेट म्हणजे शून्य बजेट आहे कुणालाही काहीही मिळालं नाही अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांना उत्तर देत राहुल गांधी यांची दया येते ते समजून न घेता बोलत आहेत असं प्रत्युत्तर निर्मला सीतारामन यांनी दिलं आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा अर्थसंकल्प निरर्थक असल्याचे म्हटले होते. आता राहुल गांधींच्या प्रतिक्रियांवर अर्थमंत्र्यांनी आपलं मत मांडलं आहे. राहुल गांधींची खिल्ली उडवत अर्थमंत्र्यांनी ट्विटरवर भाष्य करून काहीही होत नाही, त्यांनी आधी काहीतरी केले पाहिजे, असे म्हटले आहे.
मला त्या लोकांची दया येते जे खूप लवकर प्रतिक्रिया देतात. तुम्हाला ट्विटरवर काहीतरी टीका करायची आहे म्हणून ते बोलतात. हे तुमच्या कामी येणार नाही. त्यांनी आधी काँग्रेसशासित राज्यात काहीतरी करावे आणि मग त्याबद्दल बोलावं असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
#WATCH | I pity people who come up with quick responses…Just because you want to put something on Twitter, it doesn't help. He should first do something in Congress-govern states then talk about it: FM Nirmala Sitharaman on Congress leader Rahul Gandhi's comment on Budget 2022 pic.twitter.com/m90TGkq8s4
— ANI (@ANI) February 1, 2022
पत्रकार परिषदेत जेव्हा अर्थमंत्र्यांना राहुल गांधींच्या टिकेबद्दल विचारण्यात आले तेव्हा, देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या नेत्याने गृहपाठ न करता अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे. त्यांनी प्रथम त्यांच्या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांची काळजी घ्यावी. केंद्राने ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या त्यांनी राबवाव्यात. त्यांनी पंजाब, महाराष्ट्र आणि छत्तीसगडकडे लक्ष द्यावे, असे अर्थमंत्री म्हणाल्या.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर, सरकारने देशातील मध्यमवर्गीयांना दिलासा न देऊन विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला. पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी, ‘भारतातील पगारदार वर्ग आणि मध्यमवर्ग या महामारीच्या काळात, पगारात सर्वांगीण कपात आणि महागाईच्या काळात दिलासा मिळण्याची आशा करत होते’ मात्र त्यांना दिलासा दिला नाही असं म्हटलं आहे.