बिहारमध्ये नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; भाजपला मोठा वाटा, नितीश कुमारांचं ‘हे’ खातं काढून घेतलं

पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विक्रमी दहाव्यांदा शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या विस्तारित युती मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या खात्यांचे वाटप केले आहे. या नवीन सरकारमध्ये सर्वाधिक ८९ जागा जिंकणाऱ्या भाजपला सर्वात मोठा वाटा मिळाला आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे अनेक वर्षांपासून असलेले गृहखाते आता सम्राट चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. चौधरी यांना तारपूर मतदारसंघातून १,२२,४८० मते मिळाली होती. त्याचप्रमाणे, विजय कुमार सिन्हा यांच्यावर भू-सुधार आणि महसूल तसेच खाण आणि भूविज्ञान या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. सिन्हा यांनी लखीसराई मतदारसंघातून १,२२,४०८ मते मिळवून विजय मिळवला होता.
भाजपकडे महत्त्वाची खाती –
भाजपच्या वाट्याला आलेली इतर काही प्रमुख खाती आणि त्यांचे मंत्री खालीलप्रमाणे:
आरोग्य आणि कायदा: मंगल पांडे
रस्ते बांधकाम; शहर विकास आणि गृहनिर्माण: नितीन नवीन
उद्योग: दिलीप जयस्वाल
माहिती आणि जनसंपर्क; क्रीडा: श्रेयसी सिंह
पर्यटन; कला, संस्कृती आणि युवा: अरुण शंकर प्रसाद
श्रम संसाधन: संजय टायगर
पशु आणि मत्स्य संसाधन: सुरेंद्र मेहता
आपत्कालीन व्यवस्थापन: नारायण प्रसाद
सहकार; पर्यावरण, वन आणि हवामान बदल: प्रमोद चंद्र बंशी
कृषी: रामकृपाल यादव
अनुसूचित जाती/जमाती कल्याण: लाखेंद्र पासवान
मागास आणि अतिमागास वर्ग कल्याण: रमा निपात
लहान मित्रपक्षांनाही स्थान –
पाटणा येथील गांधी मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भव्य शपथविधी समारंभ पार पडला. ७४ वर्षीय नितीश कुमार यांनी जनता दल युनायटेड (JDU) च्या आठ, लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) च्या दोन, हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM) आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (RLM) च्या प्रत्येकी एका मंत्र्यासह एकूण २६ मंत्र्यांसोबत पदभार स्वीकारला आहे.
एलजेपी (आर): ऊस उद्योग आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी
एचएएम (HAM): लघु जलसंपदा
आरएलएम (RLM): पंचायती राज




