हिंदूंवर प्रेम म्हणजे मुस्लिमांचा द्वेष करणे का ?
- ममता बॅनर्जींचा सवाल
कोलकाता – आपल्यावर मुस्लिमांचे लांगूलचालन केल्याचा आरोप करणारे लोक हे मुस्लिमांचेही मित्र नाहीत आणि हिंदूंचेही मित्र नाहीत, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. हिंदूंवर प्रेम करणे म्हणजे मुस्लिमांचा द्वेष करणे असे आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थ्बित केला आहे.
भाजप आणि अन्य काही संघटनांकडून ममता बॅनर्जी यांच्यावर सातत्याने मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यचा आरोप केला जात असतो. त्या टीकेला उत्तर देताना बॅनर्जी यांनी “हा देश सर्वांचा आहे. त्यामुळे एकावर प्रेम म्हणजे दुसऱ्याचा द्वेष हे समिकरण योग्य नाही.’ असे म्हटले आहे. ईद उल फित्रच्या निमित्ताने आयोजित विशेष प्रार्थनासभेच्यावेळी त्या बोलत होत्या.
2019 साली होणाऱ्या निवडणूकीमध्ये देशातील जातीयवादी आणि हिंसाचाराचे वातावरण समाप्त होईल. दहशतवाद्यांना धर्म नसतो, हे आपल्याला मान्य करावे लागेल. जातीयवादी, द्वेषाच्या आणि हिंसेपासून देशाला मुक्त करण्यासाठी 2019 च्या निवडणूकीत आपल्याला एकत्र लढावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. देशात काही महिन्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभुमीवर त्या बोलत होत्या.