संसदीय अधिवेशनाच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सदने जोडणार
नवी दिल्ली – जगभरात कोरोनाचे संकट असतानाही येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांनी सर्व तयारी ऑगस्ट महिन्याच्या तिसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी संसदेच्या इतिहासातले काही मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. दोन्ही सदने पहिल्यांदाच जोडली जाणार असून या सदनांच्या चेंबर आणि गॅलरीचा वापर केला जाणार आहे.
कोरोना विषाणूच्या संकटात संसदेचे कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहावे यासाठी राज्यसभेच्या चेंबरमध्ये ४ मोठे स्क्रिन लावण्यात आले आहेत. तर राज्यसभेच्या गॅलरीमध्ये १ मोठा आणि ४ छोटे स्क्रिन लावण्याचे काम सुरू आहे. याव्यतिरिक्त गॅलरीमध्ये ऑडिओ कंसोल आणि अल्ट्राव्हॉयलेट जंतूनाशक रेडिएशनचा वापर केला जात आहे. संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सदने जोडली जात आहे. तसेच यासाठी ऑडिओ व्हिज्युअल सिग्नलच्या प्रसारणासाठी दोन्ही सदनांना जोडणारी विशेष केबलही लावण्यात येत आहे.
याव्यतिरिक्त चेंबरला गॅलरीपासून वेगळे करण्यासाठी पॉली कार्बोनेट शीटचा वापर करण्यात येत आहे. १९५२ नंतर संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच संसदेच्या अधिवेशनासाठी दोन्ही सदनांच्या चेंबर आणि गॅलरींचा वापर करण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता यावे यासाठी अशा प्रकारच्या विशेष योजना तयार करण्यात येत आहेत.
राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निरनिराळ्या पर्यायांच्या पडताळणीनंतर पावसाळी अधिवेशनासाठी दोन्ही सदनांच्या चेंबर आणि गॅलरीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्यसभेच्या ६० सदस्यांना राज्यसभेच्या चेंबर आणि ५१ सदस्यांना राज्यसभेच्या गॅलरीत बसवण्यात येणार आहे. तर बाकी १३२ सदस्य लोकसभेच्या चेंबर्समध्ये बसतील.