शाकाहारी प्रवाशास मांसाहार देणे एअर एशियाला पडले महागात

एका शाकाहारी प्रवाशाला मांसाहारी पदार्थ खाण्यास देणे व त्याच्या कुटूंबीयास त्रासदायक वागणुक देणे एअर एशिया या विमान कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने एअर एशियाला १.५४ लाखांचा दंड ठोठवला आहे. पंचकुला येथील रहिवासी विजय त्रेहान (वय-६१) यांनी अमृतसरहुन कुआलालंपुरला जाण्यासाठी व परत येण्यासाठी एअर एशियाचे ७ व १३ ऑक्टोबर २०१८ रोजीचे तिकीट बुक केले होते. मात्र काही अडचणींमुळे पोहचण्यास दहा मिनीटे उशीर झाल्याने त्यांना विमानात बसू दिले नाही, त्यामुळे त्यांना तत्काळ दुस-या विमानाचे तिकीट खरेदी करावे लागले.
यानंतर ते परतत असताना त्यांना चिकन सॅण्डवीच देण्यात आले. खरेतर त्रेहान शाकाहारी असल्याने त्यांनी चीज सॅण्डवीच मागितले होते, मात्र त्यांना ते मिळाले नाही. अखेर भारतात परतल्यावर त्रेहान यांनी एअर एशियाविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी न्यायालयाने सांगितले की, एखाद्या शाकाहारी व्यक्तीस मांसाहारी खाद्यपदार्थ देणे सेवांचे उल्लंघन करणे आहे. यामुळे केवळ धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत, तर अपराधाची भावना मनात आल्याने त्या उलटी देखील होऊ शकते. ग्राहक मंचाने विमान कंपनीला आदेश दिले आहेत की, त्रेहान परिवारास तिकीट खरेदीचे १ लाख १९ हजार २१३ रूपयांबरोबर व्याज व भौतिक – मानसिक त्रास झाल्याबद्दल ३० हजार व खटला चालवण्यासाठी आलेला खर्च म्हणून साडेपाच हजार रूपये अशी नुकसान भरपीई दिली जावी.
ग्राहक न्यायालयाकडे केलेल्या तक्रारीत त्रेहान यांनी सांगितले होते की, त्यांनी जाण्यासाठी ५९ हजार ४८२ रुपयांचे व येण्यासाठी १५ हजार १६ रूपयांचे तिकीट खरेदी केले होते. इंडियन एक्सप्रेसने म्हटल्याप्रमाणे, त्यांना जातांना कोणतीही अडचण आली नाही. मात्र भारतात परत येतांना अनेक अडचणी आल्या. १३ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांचे कुटुंब कुआलालंपुर विमानतळावर पोहचले व त्यांनी सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंत त्यांनी आपल्या सामानाची व बोर्डिंग पास आदींची औपचारिकता पुर्ण केली. विमानाची उड्डाण घेण्याची वेळ सायंकाळी ७.२० ची होती, इमिग्रेशन काउंटर व सुरक्षा तपासणीच्या ठिकाणी फार गर्दी असल्याने त्यांच्या परिवारास आवश्यक त्या औपचारिकता पुर्ण करण्यास जवळपास सव्वा तास लागला, त्यांच्या परिवारात पाच ज्येष्ठ व तीन लहान मुल होती. त्यांनी सांगितले की, बोर्डिंग पास काउंटर व टर्मिनलच्या बाहेर पडण्याच्या गेट पर्यंत जवळपास एक किलोमीटर अंतर होते. शिवाय हा नेमका मार्ग दर्शवणारी चिन्ह देखील नव्हती, मदतीसाठी कुणी कर्मचारी देखील नव्हता. कसेबसे त्यांचे कुटुंब जेव्ही टर्मिनलजवळ पोहचले तेव्हा त्यांना तेथील अधिका-यांनी त्यांना विमानात चढू दिले नाही, तुम्हाला पोहचण्यास १० मिनीटे उशीर झाला आहे असे त्यांना सांगण्यात आले. त्रेहान यांनी सांगितले की, खरतर विमान तेव्हा धावपट्टीवरच होते व सुरू देखील झाले नव्हते. शिवाय विमान प्रशासनाकडून कोणतीही घोषणा देखील करण्यात आली नव्हती. त्यामुळेच आम्हाला पोहचण्यास उशीर झाला. अखेर त्यांना तत्काळ दुस-या विमानाची जवळपास १ लाख रूपयांचे तिकीट घ्यावे लागले. परदेशात असल्यामुळे त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता आहे. कारण, तिथे हॉटेलमध्ये थांबणे देखील अधिक खर्चिक होते.





