breaking-newsराष्ट्रिय
विवेक तिवारींच्या हत्या प्रकरणी केजरीवालांचे वादग्रस्त वक्तव्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/Arvind-kejriwal-.jpg)
- भाजपला हिंदूंच्या हिताची चिंता नाही
नवी दिल्ली- उत्तर प्रदेशात पोलिस गोळीबारात मरण पावलेल्या ऍपल कंपनीच्या पदाधिकाऱ्यासंदर्भात बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर टीका करताना केजरीवाल यांनी “भाजपला हिंदूंच्या हिताच्या रक्षणाची चिंता नाही.’ असे ट्विट केले होते. या प्रकरणात मरण पावलेले पदाधिकारी विवेक तिवारी यांच्या पत्नीशी आपण फोनवरून चर्चा केली असेही केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हिंदी आणि इंग्रजीतून केलेल्या काही ट्विटमध्ये केजरीवाल यांनी या गोळीबाराच्या प्रकरणावरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली. विवेक तिवारी हे हिंदू होते. मग त्यांना का मारण्यात आले? भाजप नेते देशभरातील हिंदू मुलींवर बलात्कार करत आहेत. भाजप काही हिंदूंचा शुभचिंतक नाही. जर त्यांनी सत्तेसाठी हिंदूची हत्या केली असेल, तर ते याचा फेरविचार करणार नाहीत, असे केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी केजरीवाल यांच्या आरोपांवर तीव्र टीका केली आहे. संतोष कोळी आणि सोनी या “आप’च्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी “आप’ नेत्यांचा कथित सहभाग असल्याचा आरोप आहे, याचा उल्लेख तिवारी यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.