राजस्थान काँग्रेसकडून ‘जन घोषणा पत्र’ जाहीर
शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुली-महिलांना मोफत; शिक्षण, सुशिक्षितांना ३५०० रुपये बेरोजगारी भत्ता
शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुली आणि महिलांसाठी मोफत शिक्षण, सुशिक्षित युवकांसाठी ३५०० रुपये बेरोजगारी भत्ता आणि वयोवृद्ध शेतकऱ्यांना निवृत्तिवेतन अशी आश्वासने राजस्थान काँग्रेसने गुरुवारी जाहीर केलेल्या आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिली आहेत.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस अविनाश पांडे, प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि जाहीरनामा समितीचे अध्यक्ष हरीश चौधरी यांनी ‘जन घोषणा पत्र’ हा जाहीरनामा गुरुवारी प्रसिद्ध केला.
ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून पक्ष जनतेपर्यंत पोहोचला आहे आणि जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी जवळपास दोन लाख सूचना आल्या होत्या, असे पायलट म्हणाले. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास या जाहीरनाम्याची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्याचा पक्षाचा उद्देश आहे, असेही ते म्हणाले.
सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असून मुलींना आणि महिलांना मोफत शिक्षण देणार आहे. त्याचप्रमाणे सुशिक्षित युवकांना दरमहा ३५०० बेरोजगार भत्ताही देण्यात येणार आहे. सत्तारूढ भाजपने दरमहा पाच हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन दिले आहे.
जाहीरनामा तयार करण्यापूर्वी जनतेच्या सूचनांचा विचार करून पक्षाच्या ‘राहुल मॉडेल’वर आधारित हा जाहीरनामा आहे, असे गेहलोत म्हणाले. काँग्रेसच्या सरकारने स्थापन केलेली विद्यापीठे भाजप सरकारने बंद केली ती पुन्हा सुरू करण्यात येतील, असेही गेलहोत यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हरिदेव जोशी यांच्या नावाने काँग्रेस सरकारने विद्यापीठे स्थापन केली होती, असेही ते म्हणाले.