मनुवाद्यांनी चोर दरवाजाने आरक्षण संपवले: लालूप्रसाद यादव
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी संविधानात दुरूस्ती करून १० टक्के आरक्षण लागू केल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी मोदी सरकारवर आरक्षणावरून हल्लाबोल केला आहे. त्यांनी नोकरीच्या जाहिरातीचे ट्विट केले आणि म्हटले की, उच्च शिक्षणात एससी, एसटी, ओबीसी आरक्षण संपुष्टात झाल्यानंतर आणि १३ पाँईंट रोस्टर लागू झाल्यानंतर नोकरीची पहिली जाहिरात आली आहे. यामध्ये एकही पद एससी, एसटी, ओबीसासाठी नाही. मनुवाद्यांनी चोर दरवाजाने आरक्षण संपुष्टात आणले आहे. आता साडेतीन लाख रिकामी पदे अशाच पद्धतीने भरणार का ?
लालूप्रसाद यांनी केंद्रीय विद्यापीठ राजस्थानने २५ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या एका जाहिरातीचा हवाला देत ट्विट केले आहे. जाहिरातीत अनेक विभागांमध्ये ३३ शिक्षकांची भरती केली जाणार आहे. यातील सर्व पदे हे अनारक्षित दाखवण्यात आले आहेत.
यावर लालूप्रसाद यांची मुलगी आणि राज्यसभा खासदार मिसा भारती यांनीही ट्विट करत लिहिले आहे की, विद्यापीठांमध्ये एससी, एसटी, ओबीसी आरक्षण संपवणारे १३ पाँईंट रोस्टर लागू केल्यानंतर राजस्थान केंद्रीय विद्यापीठाने ३३ शिक्षकांच्या भरतीची जाहिरात काढली आहे. यामध्ये एससी, एसटी, ओबीसीसाठी एकही पद नाही. तुमच्या राजकारणासाठी बहुजनांचा हक्क का विकून आलात असा सवाल बहुजन समाजाने भाजपा आणि एनडीएच्या आपल्या खासदारांना करावा असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय विद्यापीठात ओबीसी, एससी आणि एसटीच्या प्राध्यापकांसाठीच्या आरक्षणावरून निकाल दिला. त्यानंतर आरक्षणाच्या प्रक्रियेत बदल झाला आहे.