मंदीसदृश स्थितीतही भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Untitled-27-3.jpg)
जागतिक पातळीवरील आर्थिक मंदीसदृश स्थितीने भारताला मोठा फटका बसला असला तरी अजूनही तो वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेला देश आहे, असे मत जागतिक बँकेचे अर्थतज्ज्ञ हॅन्स टिमर यांनी व्यक्त केले आहे.
जागतिक बँकेचे दक्षिण आशिया विषयक अर्थतज्ज्ञ असलेल्या टिमर यांनी सांगितले,की जागतिक आर्थिक मंदीसदृश स्थितीचा फटका भारताला बसत असूनही त्याचा वाढीचा दर इतर अनेक देशांपेक्षा अधिक आहे यात शंका नाही.
भारताचा विकास दर २०१६ मध्ये ८.२ टक्के होता, तो पुढील दोन वर्षांत २.२ टक्के घसरला याबाबत विचारले असता ते म्हणाले,की गुंतवणूक व वस्तूंच्या खपाअभावी भारताला फटका बसला आहे. त्यामुळे या देशाला अनेक गंभीर प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे. आता जो विकास दर अंदाज कमी करण्यात आला आहे, तो २०१२ च्या तुलनेत फार मोठी घट म्हणता येणार नाही. २००९ मध्येही असेच मंदीसदृश वातावरण होते तेव्हाही अशीच घट झाली होती. त्यापेक्षाही आताची घट फार मोठी नसली तरी गंभीर परिस्थिती आहे हे मान्य करावेच लागेल. जगात सध्या जी आर्थिक परिस्थिती आहे त्यानुसारच भारतातील चित्र आहे. कारण जगात सगळीकडे गुंतवणूक कमी होत आहे व जागतिक बाजारपेठेत अस्थिरता वाढत आहे. भारतातील ८० टक्के मंदीसदृश स्थिती ही जवळपास जागतिक कारणांमुळे आहे. विकसनशील देशांची निर्यात कमी झाली असून त्यामुळे त्यांची देशांतर्गत अर्थव्यवस्थाही खाली येत आहे, असे त्यांनी सांगितले.