‘भारत सोडणं मोठी चूक, २४ तासांत परतणार’, IMA घोटाळ्यातील आरोपी मन्सूर खानचा दावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/mansoor-khan.jpg)
जवळपास २३ हजारांहून जास्त लोकांची फसवणूक करुन भारतातून पळ काढणारा मुख्य आरोपी मोहम्मद मन्सूर खान याने भारत सोडणं आपली मोठी चूक होती आणि आपण २४ तासांत भारतात परतणार आहोत असा दावा केला आहे. आय मॉनेटरी अॅडव्हायजरी’ (आयएमए) समूहाचा संस्थापक असणारा इस्लामिक बँकर मन्सूर खान याने ८ जूनच्या रात्री भारतातून पळ काढला होता. त्याने लोकांना कोट्यवधीचा गंडा घातला होता.
मन्सून खान याचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यात तो सांगत आहे की, “पुढील २४ तासांत मी भारतात परतणार आहे. माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर पुर्ण विश्वास आहे. भारत सोडणं ही माझी सर्वात मोठी चूक होती. पण परिस्थिती अशी होती की मला भारत सोडणं भाग होतं. माझं कुटुंब कुठे आहे हेदेखील मला माहिती नाही”.
मन्सूर खान याने अनेकांना मोठे रिटर्न्स मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत गंडा घातला आहे. त्याने सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याची धमकीही दिली होती. मन्सूर खान याने मुस्लिम समुदायातील लोकांना लक्ष्य करत तब्बल १ हजार ५०० कोटी रूपये जमवले होते. विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याने पळ ठोकला होता. बंगळुरू शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली होती. पण त्याआधीच त्याने भारत सोडून पळ काढला होता.