भारतविरोधी शक्तींसमोर पंतप्रधान मोदींची शरणागती : ओमर अब्दुल्ला
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका लोकसभेसोबत एकत्र न घेता पुढे ढकलण्यात आल्याने माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. निवडणुका पुढे ढकलून मोदींनी भारतविरोधी शक्तींसमोर शरणागती पत्करली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ओमर यांनी एकामागून एक अनेक ट्विटद्वारे केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.
ओमर म्हणाले, बालोकोट आणि उरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थित हाताळल्याचे प्रतिक नाहीत. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती त्यांनी आणखीनच बिघडवली आहे. आता तर विधानसभा निवडणुका पुढे ढकलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान, दहशतवादी आणि हुर्रियतसमोर नांगी टाकली असून ५६ इंचाची छाती फेल झाली आहे. १९९६ पासून पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका वेळेत होणार नाहीत.
ओमर यांनी अनेक ट्विट्स केले आहेत. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर जम्मू-काश्मीरची परिस्थिती चुकीच्या पद्धतीने हाताळली असल्याचे म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधील निवडणुका आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी ठरणार आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी अशा प्रकारे जागतिक स्तरावर आपल्या अपयशाची कबुली देतील, याचा मी कधीही विचार केला नव्हता असेही ओमर यांनी म्हटले आहे.