पत्नीसाठी धावून आलेल्या जावयावर सासरकडच्यांनी तलवारीने केले वार
पत्नीची मारहाणीतून सुटका करण्यासाठी गेलेल्या पतीवरच सासरकडच्या मंडळींनी तलवारीने हल्ला केला. साबरमती भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचे आजोबा आणि वडिल तिला मारहाण करत होते. या प्रकरणी सुरींदरसिंह भट्टी यांनी चांदखेडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
साबरमतीमध्ये जवाहर चौकजवळच्या सुंदरम कॉम्पलेक्समध्ये राहणाऱ्या सुरींदरसिंहचे मनिषा तुषवाडा या तरुणीबरोबर गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मागच्यावर्षी पाच फेब्रुवारी २०१८ रोजी सुरींदर आणि मनिषाने कोर्ट मॅरेज केले. लग्नाची नोंदणी झाल्यानंतर मनिषा तिच्या आई-वडिलांकडेच राहत होती. सुरींदरच्या घरच्यांनी तिला सून म्हणून स्वीकारले होते असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
सुरींदरच्या आईवडिलांनी मनिषांच्या कुटुंबियांना मुलांचा निर्णय मान्य करण्याचा सल्ला दिला. पण त्यांना हे लग्न मान्य नव्हेत. मुलीने निवडलेल्या मुलावर त्यांचा राग होता. सोमवारी संध्याकाळी मनिषाने सुरींदरला फोन करुन वडिल आणि आजोबा आपल्याला मारहण करत असल्याचे सांगितले. मनिषाची सुटका करण्यासाठी सुरींदर तिथे पोहोचला. त्यावेळी वडिल आणि आजोबा खूप वाईट पद्धतीने मनिषाला मारहाण करत होते. सुरींदर सिंह भट्टीने मारहाण रोखण्यासाठी हस्तक्षेप केल्यानंतर वडिल आणि आजोबा प्रचंड चिडले. त्यानंतर त्यांनी भट्टीला मारहाण सुरु केली. मनिषाच्या आजोबांनी तलवार काढली व सुरींदरवर वार केले. सुरींदरसोबत मित्रही गेली होता. त्याने त्याची सुटका केली.