पंतप्रधान मोदींनी संसदेतून पळ काढला – राहुल गांधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/rahul-gandhi-Prime-Minister-Narendra-Modi.jpg)
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी गुरुवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत बोचरी टीका केली आहे. सभागृहात आज राफेल डीलवरील चर्चेच्यावेळी पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नसतील. त्यावरुन राहुल गांधींनी मोदींना उपरोधिक टोले लगावले आहेत. सभागृहात राफेलच्या प्रश्नांना सामोरे जाण्याऐवजी पंतप्रधान मोदींनी संसदेतून पळ काढल्याचा आरोप राहुल यांनी केला.
पंतप्रधानांनी संसद आणि स्वत:चे खुले पुस्तक राफेलच्या परीक्षेपासून पळ काढल्याचे दिसत आहे. त्याऐवजी ते पंजाबमधील आकर्षक विद्यापीठात विद्यार्थ्यांना व्याख्यान देणार आहेत. मी त्या विद्यार्थ्यांना एवढीच विनंती करेन की, मी विचारलेल्या चार प्रश्नांची त्यांना उत्तरे देण्यास सांगा असे खोचक टि्वट राहुल यांनी केले आहे.
जालंधर एलपीयूमध्ये पंतप्रधान मोदी १०६ व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर गुरदासपूर येथे एका सभेला संबोधित करतील. राफेल डीलवरुन काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांनी काल संसदेत आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.
प्रत्येक राफेल विमानाची किंमत ५२६ कोटी वरुन १६०० कोटी रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णय कोणी घेतला? अरुण जेटली सांगतात एनडीएने चांगला करार केला मग १२६ फायटर विमाने का खरेदी केली नाही ? असे प्रश्न राहुल यांनी विचारले. अनिल अंबांनी यांच्यावर ४५ हजार कोटींचे कर्ज होते. नरेंद्र मोदींनी त्यांना ३० कोटींचा फायदा करुन दिला या आपल्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. राफेलवर पंतप्रधान मोदींना त्यांनी समोरासमोरच्या खुल्या वादविवादाचेही आव्हान दिले.