दहशतवाद्यांविरोधात कारवाई करा, जपानने पाकिस्तानला सुनावलं
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/Japan-Foreign-Minister.jpg)
दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कठोर पाऊल उचला अशा शब्दांत जपानने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. काश्मीरमध्ये सध्या परिस्थिती बिघडत असून, त्यासंबंधी चिंता असल्याचंही जपानने म्हटलं आहे. जपानचे परराष्ट्र मंत्री टारो कोनो यांनी यावेळी १४ फेब्रवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्याचा निषेध केला. यावेळी त्यांनी भारत आणि पाकिस्तानने चर्चेतून प्रश्न सोडवून परिस्थिती नियंत्रणात आणावी असं मत व्यक्त केलं.
जपानचे परराष्ट्र मंत्री टारो कोनो यांनी म्हटलं आहे की, ‘काश्मीरमध्ये परिस्थिती बिघडत असून आपल्याला चिंता आहे. १४ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदने जबाबदारी घेतलेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. दहशतवादाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने कठोर पाऊलं उचलणं गरजेचं आहे’.
पुढे त्यांनी सांगितलं की, ‘भारतीय आणि पाकिस्तानी हवाई दल यांच्यात 26 फेब्रुवारीपासून तणावपूर्ण स्थिती असून भारत आणि पाकिस्तानने कारवाई थांबत चर्चेतून प्रश्न सोडवणं गरजेचं आहे’.
याआधी पुलवामा तणावामुळे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची जपान भेट स्थगित करण्यात आली होती. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी हे २४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी अशा चार दिवसांच्या पूर्वनियोजित जपान भेटीवर जाणार होते, मात्र पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधात आलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली जपान भेट स्थगित केली होती.