कोरोना मृतांच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर
नवी दिल्ली – जगभरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान माजवले असून कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यातच, आता कोरोनामुळे सर्वाधिक मृत होणाऱ्या देशांत भारताचा तिसरा क्रमांक लागत आहे. म्हणजेच, भारतात कोरोना मृतांची संख्या वाढत असून भारताने मॅक्सिकोलाही मागे टाकले आहे. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे ६२ हजार ६३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापूर्वी भारतापेक्षा सर्वाधिक मॅक्सिकोत ६२ हजार ५९४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर आतापर्यंत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिका आणि ब्राझीलमध्ये झाले आहेत.
अमेरिकेत कोरोनामुळे १ लाख ८५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे त्या खालोखाल ब्राझीलमध्ये १ लाख १९ हजार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. भारतात जून महिन्यात अनलॉक प्रक्रिया राबवण्यास सुरूवात झाली. यानंतर कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येत आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाल्याची दिसून आली. भारतात यापूर्वी १० लाख व्यक्तींमागे मृत्यूंची संख्या ही ५ इतकी होती. ती आता १० लाख व्यक्तींमागे ४५ इतकी झाली आहे. तर प्रत्येक १० लाखांमध्ये रुग्णांची संख्याही आता २ हजार ५५४ इतकी झाली आहे.
भारतात गेल्या काही दिवसांमध्ये दररोज ७५ हजारांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. शुक्रवारीही ७७ हजारांपेक्षा अधिक नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दिवसभरात ६५ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी करोनावर मात केली. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता वाढून ३४ लाखांच्या वर गेली आहे. देशात करोना चाचण्यांची संख्याही आता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. देशात आतापर्यंत तब्बल ४ कोटींच्या जवळपास लोकांची करोना चाचणी करण्यात आली आहे.