कॉंग्रेसकडून 10 सप्टेंबरला भारत बंदचे आवाहन

- इंधन दरवाढीवरून मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
नवी दिल्ली – इंधन दरांच्या भडक्यावरून कॉंग्रेसने मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. सरकारची कोंडी करण्याच्या उद्देशातून पक्षाने 10 सप्टेंबरला (सोमवार) भारत बंद पुकारला आहे.
पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या चढ्या दरांचे चटके सामान्य माणसाला बसत आहेत. त्यामुळे सरकारने केलेल्या 11 लाख कोटी रूपयांच्या इंधन लुटीकडे लक्ष वेधण्यासाठी आणि इंधनांवरील करांमध्ये कपात करण्याच्या मागणीसाठी आम्ही देशव्यापी बंदचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी दिली. या बंदमध्ये इतर विरोधी पक्षांनी आणि नागरी संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
इंधनांच्या चढ्या दरांमुळे सामान्य माणसाचे बजेट ढासळले आहे. त्यामुळे जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत आणण्याची आमची मागणी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मागील काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. त्या इंधनांच्या दरांनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.





