काश्मीरमधील ‘एसएमएस’ सेवा स्थगित
- पोस्टपेड मोबाइल सुविधा मात्र सुरूच
श्रीनगर : काश्मीरमध्ये पोस्ट-पेड भ्रमणध्वनी सेवा सुरू केल्यानंतर काही वेळातच खबरदारीचे उपाय म्हणून एसएमएस सेवा बंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
काश्मीरमध्ये ७२ दिवसांनंतर इंटरनेट सुविधेविनाच पोस्ट-पेड भ्रमणध्वनी सेवा सोमवारी सुरू करण्यात आली. मात्र सायंकाळी ५ वाजता एसएमएस सेवा स्थगित करण्यात आली. खबरदारीचे उपाय म्हणून सोमवारी सायंकाळी एसएमएस सेवा बंद करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र त्याबाबत सविस्तर तपशील देण्यास अधिकाऱ्याने नकार दिला.
पाकिस्तानमधील एका नागरिकासह दोन दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री ८ वाजता शोपियान जिल्ह्य़ात एका ट्रकचालकाची गोळ्या घालून हत्या केली, तर सफरचंदांच्या बागेच्या मालकाला बेदम मारहाण केली. फळांची वाहतूक मोठय़ा प्रमाणावर सुरू झाल्याचे पाहून आलेल्या नैराश्यातून ही हत्या आणि मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सोमवारी भ्रमणध्वनी सेवा सुरू झाल्यामुळे ग्राहक आनंदित झाले होते, मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही कारण सेवा स्थगित करण्यात आल्याच्या कालावधीतील देयकांची थकबाकी असल्याने दूरसंचार कंपन्यांनी ग्राहकांची सेवा खंडित केली होती. त्यामुळे मंगळवारी सकाळी दूरसंचार कंपन्यांसमोर देयके भरण्यासाठी लांबलचक रांगा लागल्याचे पाहावयास मिळाले.