Breaking News | बाबरी प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
अयोध्या | 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लागला. या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी मशिद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला आहे. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हटलं आहे.
तसेच या मोठ्या राजकीय नेत्यांनी ही हिंसा रोखण्याचाही प्रयत्न केला होता. या घटनेबाबत कोणताही पुरावा नाही. “विहिप नेते अशोक सिंघल यांच्याविरुद्ध पुरावा नाही. फोटो, व्हिडीओ, फोटोकॉपीमध्ये ज्या पद्धतीने पुरावे देण्यात आले आहेत, त्यावरुन काहीही सिद्ध होत नाही”, असेही न्यायाधीश एस.के. यादव यांनी सांगितले.
बाबरी खटल्यावर सीबीआय(CBI) चे विशेष न्यायालयाने आज (बुधवारी 30 सप्टेंबर) निकाल दिला. या खटल्यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार, कल्याण सिंह यांसारख्या मोठ्या राजकीय व्यक्तींसह एकूण 32 जण आरोपी होते. लखनौमधील कोर्टात सकाळी 11 वाजता या निकाल वाचनाला सुरुवात झाली. जवळपास दीड तासांनी म्हणजे 12.30 वाजता या घटनेचा निकाल आला. या निकालाकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागले होते.