३० हजार रुपये पगारापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना ईएसआयसीचा लाभ
नवी दिल्ली – राज्य कर्मचारी वीमा महामंडळाच्या आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. ती ३० हजार रुपये केली जाणार आहे. यामुळे आणखी जास्त कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या २१ हजारांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळतो. मात्र ईएसआयसी मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या योजनेच्या विस्ताराचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे ३० हजार रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
ईएसआयसीच्या आरोग्य योजनेतील पगाराची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्रीय श्रम मंत्रालयाने दिला होता. त्यानुसार मंडळाच्या झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली, अशी माहिती मंडळाचे सदस्य हरभजन सिंग यांनी दिली. पगाराची ही मर्यादा ३० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे याचा फायदा २० ते २५ टक्के ज्यादा कर्मचाऱ्यांना होणार आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत हा निर्णय घेतला जाईल. यामुळे या योजनेतील निधीत वाढ होईल. आणि जास्तीत जास्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना याचा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले. या योजनेसाठी ईएसआयसी योजनेतील सदस्य कामगाराच्या वेतनातून ०.७५ टक्के आणि कंपनीकडून ३.२५ अंशदान घेतले जाणार आहे. यापूर्वी हे अंशदान ६.५ टक्के होते. देशातील ६ कोटी कामगारांना या योजनेचा फायदा होतो.