जीवनगौरव पुरस्काराने सन्मान होणे ही कलाकाराच्या आयुष्यातील अभिमानाची बाब – गायिका सुषमादेवी
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानीत केल्याचा क्षण माझ्या कायम स्मरणात राहणार असून माझ्यासारख्या कलाकाराच्या आयुष्यातील ही कौतुक आणि अभिमानास्पद बाब आहे अशी प्रतिक्रिया डॉ.बाबासाहेब आंबेडकर चळवलीतील ज्येष्ठ गायिका सुषमादेवी यांनी दिली. आंबेडकर चळवळीतील सांस्कृतिक क्षेत्रातील योगदाना बद्दल महापालिकेने त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला त्या बोलत होत्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्या नियंत्रणाखाली ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. यामध्ये आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ गायिका सुषमादेवी यांचा आज जीवनगौरव पुरस्कार देऊन महापालिकेच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, उपआयुक्त आशादेवी दुरगुडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, कामगार नेते गणेश भोसले, जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे आदी उपस्थित होते.
अतोनात काष्ट करून कार्यक्रम उभा करणे साधी गोष्ट नसते, महापालिकेने माझ्या सारख्या कलाकाराचा सन्मान केला ही विशेष घटना आहे असू नमूद करून सुषमादेवी यांनी “कुंकु लावील रमानं” हे गीत यावेळी सादर केले.
महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या कलाकारांच्या कलेला दाद दिल्यानंतर कलाकारामध्ये उत्साह संचारतो. सुषमादेवी यांनी आपल्या वाणीतून आंबेडकर विचारधारा मांडली , माता रमाई यांच्यावरील गीत प्रसिध्द आहे. त्यांना महापालिकेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले हा दिवस सुषमादेवी यांच्या स्मरणात राहिल. थोर महापुरुषांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवून त्यांना सतत जागृत ठेवायचे आहे. सुषमादेवींनी हे कार्य आपल्या कलेच्या माध्यमातून केले आहे. इतिहासाला उजाळा देण्याचे काम कलाकार करीत असतात. याचा अभिमा आहे. त्यामुळे कलाकारांच्या पाठीवरून शाबासकीचा हात फिरवणे हे शासन प्रशासनाचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य महापालिकेने बजावले आहे. सुषमादेवी यांनी केलेले कार्य नवोदित कलाकारांसाठी मार्गदर्शक ठरेल असेही महापौर ढोरे म्हणाल्या.
यावेळी राजू मिसाळ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शासन आणि महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नियमांचे पालन करून साजरी केल्याबद्दल मिसाळ यांनी नागरिकांचे आभार मानले. महापालिकेचा विचार प्रबोधनपर्वाचा कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात साजरा केला जात असून कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम महापालिका करीत आहे. त्यातून महापुरुषांच्या विचारांचे आदान प्रदान होत आहे ही चांगली गोष्ट आहे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जोगदंड यांनी तर प्रास्ताविक जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले. आभार संतोष शिंदे यांनी मानले.
दरम्यान ऑनलाईन विचार प्रबोधनपर्वाच्या तिस-या दिवशी विविध कलाकारांनी प्रबोधनात्मक गीते सादर केली. यामध्ये शाहिर मेघानंत यांनी परिवर्तनाचा वादळवारा हा जलसा सादर केला तर दिव्तीय सत्रात मानवतेच्या नावानं चांगभलं हा कवी संम्मेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये कवी नितीन चंदनशिवे, सागर काकडे, सुमीत गुणवंत, अनिल दिक्षीत, रवी कांबळे, जित्या जाली यांनी सहभाग घेतला. समाजातील आक्रोश, हुंदका आणि व्यथा त्यांनी आपल्या कवितेतून मांडल्या.
यानंतर विशाल ओव्हाळ यांचे गीतगायन तसेच विनोद आटोटे यांचा गाथा महामानवाची महती रमाईची हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. प्रबोधनपर्वाच्या चौथ्या दिवशी सकाळी बुध्दरत्न लिहीतकर आणि सहकार्यांनी “निळी पहाट” हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर भारतीय बौध्द महासभेच्या संयोजनाने बुध्दवंदना घेण्यात आली. गणेश इनामदार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत नाट्यप्रयोग सादर केला. खंजीरी वादक शाहिरा मीरा उमप यांनी लोककलेच्या माध्यमातून प्रबोधनपर गीते सादर केली. यानंतर सुषमादेवी यांचे गीतगायन झाले.