बारामतीची वाटचाल पुन्हा एकदा निर्बंधाच्या दिशेने….
बारामती – शहरातील कोरोनारुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा बारामतीकरांची धाकधूक वाढू लागली आहे. पाच टक्क्यांवर पॉझिटीव्हीटी गेली तर तातडीने निर्बंध लावण्याचा निर्वाणीचा इशारा उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिला असल्याने व्यापा-यांचेही धाबे दणाणले आहे.
कोरोनाचा आलेख कोणत्याही परिस्थिती वाढू द्यायचा नाही अशी राज्य सरकारची भूमिका आहे. निर्बंध शिथील करतानाच पाच टक्क्यांवर पॉझिटीव्हीटीचा दर गेल्यास पुन्हा एकदा निर्बंधांना सामोरे जावे लागेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते.
गेल्या तीन दिवसात रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. गेल्या तीन दिवसात तब्बल 209 रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने प्रशासन काळजीत आहे. पुणे जिल्ह्यात बारामती शहर व तालुक्यात सर्वाधिक तपासण्या होत असल्याने पॉझिटीव्हीटीचा दर पाच टक्क्यांहून कमी दिसत आहे. गेल्या तीन दिवसात 4395 तपासण्या करण्यात आल्या आहेत. तीन दिवसात पॉझिटीव्हीटीचा दर 4.75 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.
बारामतीकरांकडून काळजी घेतली गेली नाही तर पुन्हा एकदा निर्बंधाना सामोरे जावे लागणार हे स्पष्ट आहे. त्या मुळे प्रत्येक कुटुंबाने आपली व इतर सदस्यांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात अनेक ठिकाणी रोज गर्दी होत असल्याने लोक संपर्कात येत आहेत. त्या मुळे गर्दी होणारी ठिकाणे शोधून तेथे प्रशासनाने काही उपाययोजना करण्याचीही मागणी होऊ लागली आहे. बँकांसह इतरही अनेक कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी मोठी गर्दी होत आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा…
“निर्बंध हटविल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचा बारामतीत पार फज्जा उडाला आहे, सॅनेटायझरचा वापर कुणीही करत नाही किंवा दुकानात येणा-या ग्राहकांची माहितीही ठेवली जात नाही. या सर्वांचा एकत्रित परिणाम रुग्णसंख्या वाढण्यात दिसत असल्याने बारामतीची वाटचाल पुन्हा एकदा निर्बंधाच्या दिशेने सुरु झाली आहे.”